साहित्य : ६ वाट्या तांदूळ, ३ वाट्या हरबरा डाळ, दीड वाटी उडीद डाळ, पाऊण वाटी मूग डाळ, पाव वाटी जिरे, पाव वाटी धणे, १ वाटी पातळ पोहे, ओवा ३ चमचे, पांढरे तीळ ३ चमचे, मीठ, तिखट, हळद, हिंग, तेलाचे पाव वाटी मोहन, गरम पाणी, तळण्यासाठी तेल.
कृती :
प्रथम भाजणी करण्यासाठी ...... तांदूळ, हरबरा डाळ, उडीद डाळ व मूग डाळ धुवून घेऊन, उपसून, वेगवेगळे स्वच्छ फडक्यावर पसरून ठेवावे. साधारण ४ - ५ तासांनंतर ते वाळल्यावर, पण जरासे ओलसर असतांना कढईत एकानंतर एक असे भाजावे. पण फक्त ओलसरपणा जाऊन कोरडे होईपर्यंत थोडेसेच भाजावे. जास्त भाजू नये. तसेच पोहे, जिरे, धणे पण भाजून घ्यावे. हे सर्व एकत्र करून गिरणीतून दळून आणावे. साधारणपणे याची २ किलो भाजणी तयार होईल.
चकल्या करताना ...... ४ वाट्या भाजणी घेतल्यास तेवढेच पाणी गरम करून घ्यावे. पीठामध्ये ओवा, तीळ, मीठ, तिखट, हळद, हिंग घालून सर्व एकत्र नीट मिसळून घ्यावे. मग त्यात पाव वाटी तेलाचे कडकडीत मोहन घालावे, पुन्हा नीट मिसळून घ्यावे. गरम केलेले पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्यावे. कढईत तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे. चकलीपात्रात पीठ घालून कागदावर चकल्या नीट गोल पाडून घ्याव्यात. तेल तापल्यावर कागदावरील चकल्या अलगद उचलून तेलात सोडाव्यात व मंद आँचेवर तळाव्यात.
( चकल्या कढईतून काढल्यावर एका लहान ताटात ठेवताना आवाज आला पाहीजे म्हणजे ती नीट तळली असे समजावे. पण ताटात काढताना जर बद्द आवाज आला तर ती अजून व्हायची आहे असे समजावे. )